Monday, 22 October 2012 08:17
रोमान्सचा बादशाह काळाच्या पडद्याआड
यश चोप्रा
यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्या रुपात दोन असे सितारे दिले ज्यांची धमक बॉलिवुडमध्ये आजही कायम आहे.
सत्तरी पार केलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अदाकारीला सुरुवातीच्या काळात यश चोप्रांनी आकार दिला. ७० एमएम स्क्रीनवर अमिताभ यांची चमक आजही कायम आहे. प्रकाश मेहरा यांची फिल्म जंजीरने अमिताभ यांना ओळख मिळवून दिली खरी पण अमिताभ सुपरस्टार ठरले तो यश चोप्रांच्या दिवारमुळेच...
दीवारमधील अँग्री यंग मॅन कामगार हा यश चोप्रा यांचीच कल्पना होती. या फिल्ममधून यश चोप्रा यांनी हिरोला सूट-बूटच्या इमेजमधून तर बाहेर काढलंच पण 'जाओ पहले उस आदमी का साइन लेकर आओ ....जिसने मेरे हाथ पर ये लिख दिया'असं म्हणणाऱ्या हिरोची कायद्याच्या चौकटीतूनही सुटका केली.
थेट कायद्याला आव्हान देणारा माणूस हा फिल्मवेड्यांना भावला. भारतीय चित्रपटसृष्टीत हे प्रथमच घडत होतं आणि त्याचे शिल्पकार ठरले यश चोप्रा.
फिल्म त्रिशूलपर्यंत अमिताभ अँग्री यंग मॅनच्या इमेजमुळे सुपरस्टार झाले होते. असा सुपरस्टार जो अभिनय संपन्न संजीव कुमार यांच्या डोळ्यात डोळे घालून आपला हक्क खुले आम मागत होता.
नेहमी कॅमेऱ्याच्या मागे राहणारे यश चोप्रा खरं तर समाजाच्या सो कॉल्ड विचारसरणीपेक्षा खूप पुढे होते. फिल्म त्रिशूल हे त्याचं उत्तम उत्तम उदाहरण. एका कुमारिकेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा आपल्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून 'तुम मेरे नाजायज बाप हो', असे संवाद फेकेल असं त्या काळी कुणालाही वाटलं नव्हतं.
अॅक्शन असो वा रोमान्स. दोन्ही प्रकारच्या फिल्म्सवर यश चोप्रा यांची मजबूत पकड होती. इतकंच नाही तर एकाच कलाकाराकडून दोन्ही प्रकारच्या भूमिका करवून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. कारण १९७५ मध्ये दीवारमधील अँग्री यंग मॅन दिसला. तर १९७६ मध्ये कभी-कभीमधील शायर...
हळूवार प्रेमाचा हा सिलसिला १९८१ मध्येही कायम राहिला. सिलसिला या फिल्मची कहाणी तर अमिताभ बच्चन यांचीच मानली जाऊ लागली. या फिल्मची गाणी ३० वर्षांनंतरही आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.
अमिताभ बच्चन एव्हाना फिल्मी दुनियेचे शहेनशाह बनले होते आणि बॉलिवुडला गरज होती आणखी एका बादशाहची. या बादशाहची गरज पूर्ण केली ती यश चोप्रांनीच. त्या बादशाहचं नाव होतं... शाहरूख खान. १९९३ मध्ये आलेल्या डर सिनेमाच्या माध्यमातून यश चोप्रांनी फिल्मी दुनियेला एक असा नायक दिला जो प्रेमाच्या नावाखाली प्रेक्षकांना दहशतीत ठेवत असे.
याच फिल्ममुळे शाहरूखची बॉलिवुडवर पकड घट्ट बसली. पण लगेचच यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्याप्रमाणेच शाहरुखलाही अँग्री यंग मॅनच्या वलयातून बाहेर काढून रोमँटिक हिरोचा साज चढवला.
दिलवाले दुल्हनिया ले जाएँगेचा हा सिलसिला दिल तो पागल है आणि पुढे वीर झारापर्यंत सुरु राहिला. आणि योगायोग असा की यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट जब तक है जान हाही प्रेक्षकांना प्रेमाचा संदेश देणाराच आहे.
तरुणाईला प्रेम करायला शिकवणारे यश चोप्रा आता उरले ते फक्त आठवणींमध्ये...